शहादा तालुक्यातील गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत ब्राह्मणपुरी, ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने जोपासले आहे. या वर्षी चांगल्या प्रकारे केळीला भाव मिळेल या आशेने इतके वर्ष केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना १६ व १७ रोजी दुपारी अचानक वादळाने थैमान घातले. यात हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्ण भुईसपाट तर काही शेतकऱ्यांचे ५०० ते एक हजारहून अधिक झाडे उमळले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरित करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महसूल व कृषी विभागामार्फत पाहणी करून पंचनामा करण्यात आला. यावेळी तलाठी स्मिता पाटील, कृषी सहायक वनसिंग खर्डे, कोतवाल भारत नेवरे, आदी शेतकरी उपस्थित होते.
ब्राह्मणपुरी परिसरात केळी पिकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST