लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची जिल्ह्यात व्याप्ती वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने जनजागृती मोहिम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला़बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बी.जी.भवाने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत २०११ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ८२ लाख कुटुंबाना पाच लाखांपर्यत मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थींचा यात समावेश आहे़ लाभार्थी कुटुंबाना दरवर्षी ५ लाखापर्यंतचे सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्गम भागात विविध ठिकाणी मेळावे, बॅनर लावून जनजागृती करावी़ योजनेसाठी स्थानिक लोककलावंतांना सोगांड्या पार्टी व पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्याची संधी देऊन योजनेतील लाभार्थींची संख्या वाढवण्याच्या सूचना दिल्या़
आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नंदुरबार जिल्हा हा राज्यात चौथ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात २ लाख १२ हजार १३९ ई सोनेरी कार्ड चे वाटप झाले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. योजनेंतर्गत रुग्णांवर करण्यात आलले उपचार तसेच दवाखान्यांची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांना देऊन योजना अंमलबजावणीबाबत चर्चा केली़