कार्यक्रमास सरपंच सुदाम ठाकरे, माजी सरपंच रविमाला नाईक, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, पर्यवेक्षिका पी.पी. सोनार, निती आयोगाचे साईनाथ हरभडे, गटसाधन केंद्रातील जगदीश राजपूत यांच्यासह १३ अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर महिला व बालविकास विभाग (एकात्मिक बालविकास सेवा योजना) अंतर्गत कोरोना काळात ज्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम केले त्या ३३ अंगणवाडी सेविका, ३३ मदतनीस यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात मनरद अंगणवाडीच्या सेविका योगिता पाटील व लांबोळा येथील अंगणवाडी सेविका उज्वला बागूल यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील पोषण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत चार आकांक्षित जिल्हे आहेत. त्यात नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद व वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पोषण पंधरवडा राबवायचा आहे. त्यासाठी येथील अंगणवाडी केंद्रात परसबाग तयार करून त्यात आठ औषधी व फळ झाडांची लागवड करण्यात आली. कोरोनाचे नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत पोषण पंधरवडा कसा राबवायचा याविषयी पर्यवेक्षिका पी.पी. सोनार यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक अंगणवाडीच्या केंद्रामध्ये तीन फळझाडे व पाच औषधी वनस्पती असे एकूण आठ वृक्ष लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पंधरवड्यात शासनाने निर्देश केल्यानुसार कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सोनार यांनी दिल्या. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.