लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : ‘त्या’ मातेची प्रसुतीपूर्व काळजी घेतात, रक्तदाब मोजतात, रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण काढू शकतात, गर्भवतीला योग्य आहार कसा घ्यावा हे सांगतात. वेळोवेळी संदर्भसेवा देऊन सुरक्षित मातृत्वासाठी धडपडतात. तसेच ताप, डोकेदुखी, हगवण, सर्दी या सारख्या छोट्या आजारांवर औषधे सूचवण्याबरोबरच बालकांचे नियमित लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, एड्स सारख्या आजाराच्या रूग्णांना औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे यासारखी महत्त्वाची कामे करून त्यांनी ग्रामीण भागात आरोग्याची आस या ‘आशां’नी निर्माण केली असून, आपापल्या गावाचे आरोग्याचे शिवधनुष्य त्या पेलत आहेत.८ मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत असला तरी आरोग्य क्षेत्रात एवढी भरीव मोलाची कामगिरी करणारी आशा कार्यकर्ती आजही उपेक्षित असून, तुटपुंज्या मानधनावर त्यांचे काम सुरू असून, याबाबत सर्व स्तरातून खंत व्यक्त होत असून, निदान महिला दिनाचे औचित्य साधून तरी त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना चांगले मानधन मिळावे. तसेच कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने भारत सरकारने २००५ साली राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ‘आशा योजना’ सुरू केली होती.
उत्तम आरोग्याची आस देणाऱ्या ‘आशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:55 IST