लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम नोव्हेंबर २०२० पासून सुरू होण्याचे संकेत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या एकेरीबाजुच्या दुरूस्तीला सुरूवात झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. राज्याच्या हद्दीवरील बेडकीपाडा ते फागणेपर्यंतचा पहिला टप्पा असून, या अंतरात राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली होती. दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून चौपदरीकरण रेंगाळले आहे. वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. महामार्गावर मोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. परिणामी इंधन, वेळ व पैशांचीदेखील नासाडी होत होती. अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली होती. कोंडाईबारी घाटात तर महामार्गच नामशेष होण्याच्या मार्गावर आला होता.राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करण्यासाठी आमदार शिरिष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. सबब महामार्ग दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात येवून त्यास मंजुरी देण्यात आली. लॉकडाऊन पूर्वी दुरूस्तीच्या कामास झालेली सुरूवात कोरोनामुळे थांबविण्यात आली होती. संचारबंदी नुकतीच उठविल्याने महामार्ग दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या सरहद्दीपासून बेडकी येथून ही दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे. शहरातील देवळफळी पावेतो ही दुरूस्ती झाली आहे.पावसाने उसंत दिल्याने हे काम जोमाने सुरू आहे. दुरुस्ती करतांना डांबराच्या थराचे कारपेट पसरविले जात आहे. डांबराचा वापरही योग्य प्रमाणात होत असल्याने वाहने धावत असल्यावरही रस्त्याची मजबुती दिसून येत आहे. दुरूस्तीच्या पाठोपाठ प्रथमच साईडपट्ट्या तयार होत असल्याने रस्त्याचा वापर करणारे अवाक होत आहेत. आतापावेतो साईडपट्ट्यांचे अस्तित्वच नसल्याने महामार्ग व साईडपट्ट्या यांचा दुरापास्त संबंधच नाही असा समज या महामार्गासाठी रूढ झाला होता. प्रथमच साईडपट्ट्या होत असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नवापूर तालुक्यातील बेडकीपाडापासून दहिवेलपर्यंत आणि दहिवेलपासून धुळेपर्यंत अश्या दोन टप्प्यात एकाच वेळी दुरूस्तीचे हे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाची दुरूस्ती होत असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान महामार्गाचे रखडलेले प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम दिवाळी दरम्यान सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, मुंबईच्या एका कंपनीला हे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
महामार्गाचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:22 IST