नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १७ एप्रिल २०२० ला आढळला होता. नंदुरबार शहरातीलच शेख अस्लम शेख मुश्ताक खाटिक (५०) असे त्यांचे नाव आहे. लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, ते दिवस आठवले की अंगावर शहारे येतात. १७ एप्रिल २०२० चा तो दिवस. मी रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे उपचार घेत होतो. सायंकाळी अचानक डॉक्टर आले आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, घाबरू नका, असे सांगत मी ज्या वाॅर्डमध्ये उपचार घेत होतो त्या वाॅर्डमधील उपचार घेणाऱ्या इतर पाच रुग्णांना तत्काळ दुसऱ्या वॉर्डात हलविण्यात आले. सुमारे ३० बाय ७० फुटाचा तो हॉल, त्याच्यात १० बेड आणि त्यात मी एकटाच. अतिशय भयानक असे ते चित्र होते. अचानक मोठा धक्का बसला. कारण कोरोनाबाबत त्यावेळी खूप भीतीचे वातावरण होते. त्यावर औषध नाही, अशीही चर्चा होती. त्यामुळे माझे काय होईल? याची मनात प्रचंड भीती. त्यात लोकांचे सातत्याने फोन आणि सल्ले. मनात अनेक विचार यायचे. दिवस तर संपायचा पण रात्र मात्र संपत नव्हती. डाॅक्टर यायचे, काळजी करू नका, असा धीर देत होते. जेवण, औषधी लांबूनच दिली जात होती. खूप विचित्र अवस्था. दोन दिवस कसे तरी गेले आणि मनात चंग बांधला. काय होईल, मृत्यू तर एक दिवस येणारच आहे त्याला कशासाठी घाबरायचे? असा मनातच प्रश्न करुन जगण्याची, लढण्याची आणि आलेल्या प्रसंगाशी सामोरे जाण्याची मनात जिद्द केली आणि त्याच सकारात्मक ऊर्जेने मी २१ दिवस घालवले. या काळात विशेषत: मी मोबाईलवर धार्मिक ग्रंथांचे पाठ-प्रवचन केले. पण या २१ दिवसात मात्र खूप शिकायला मिळाले. विशेषत: सर्वधर्मीय लोकांनी मला या आजारात लढण्याची जिद्द दिली, धीर दिला. त्यामुळे नंदुरबारमधील राष्ट्रीय एकात्मतेचे एक चांगले चित्र मी अनुभवले. डॉक्टर हे देवदूत असतात, त्याचाही अनुभव आला. डॉक्टरांनीदेखील खूप धीर दिला.
आज लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत असताना रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे लोकांना माझी कळकळीची विनंती आहे. आजाराला घाबरू नका पण शासनाचे नियम पाळा. आरोग्य विभागाच्या सूचना पाळा. सर्व काही व्यवस्थित होईल, असेही अस्लम खाटिक यांनी शेवटी सांगितले.