नागरिकांपुढे पाणीटंचाईची समस्या
तळोदा नगर पालिकेमार्फत शहरातील नागरिकांना ३२ कूपनलिकांमधून पाणीपुरवठा केला जात असतो. वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी कनेक्शन कट केले आहे. पालिकेने आठ लाख रुपये भरले असले तरी अजूनही २७ कूपनलिकांचे कनेक्शन कट केलेले आहे. त्यामुळे तेथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित बिल नगर पालिका लवकरच भरणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी नागरिकांना अजून दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
कंपनीचे दुजाभावाचे धोरण
शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडून वीज वितरण कंपनीचे साधारण अर्ध्या कोटीपेक्षा अधिक वीज बिल थकले असताना कनेक्शन कट करण्याबाबत अधिकारी उदासीन भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वास्तविक सामान्य नागरिकांचे बिल थकले तर कनेक्शन कट करण्याची नोटीस बजावली जाऊन लवकरच वीजजोडणी कापली जाते. कंपनीच्या अशा दुजाभावाच्या धोरणाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या शासकीय कार्यालयाकडे वीज बिल थकले आहे. त्यांच्या विभाग प्रमुखांना वीज बिल भरण्याबाबत तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यांनी भरण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तरीही लवकरात लवकर बिल आले नाही तर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल.
-इम्रान पिंजारी, शहर अभियंता, वीज वितरण विभाग, तळोदा.