प्रकाशा येथील ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये वीज वितरण कंपनीचे नंदुरबार येथील अधीक्षक अभियंता ए.एन. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा येथील कार्यकारी अभियंता के.डी. पावरा, उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप व सहायक अभियंता आर.एन. पाटील यांनी शिबिर घेतले. शिबिराला प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. जगताप यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांकडे पडीक व नापीक जमीन आहे ती जर भाडेतत्त्वावर शासनाच्या सौर कृषी वाहिनीसाठी दिली तर प्रतिवर्षी ३० हजार रुपये मोबदला देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर प्रतिवर्षी त्यात तीन टक्के वाढ होणार आहे, तसेच शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकी भरल्यास विलंब आकार व व्याज व अन्य सवलतींवर ६६ टक्के सूट मिळणार आहे. सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीदारांनी वीज बिल भरले तर त्यांना व्याज व विलंब आकार यावर १०० टक्के सूट मिळणार आहे. कृषी समृद्धीसाठी वीज जोडणी अर्ज केले तर त्यांना वीज वाहिनीच्या तीस मीटर आत सर्व कृषीपंपधारकांना त्वरित वीज जोडणी करून मिळणार आहे. जर ते वीज वाहिनीपासून ३० ते २०० मीटरच्या अंतरावर असेल तर त्या कृषीपंपधारकांना एरियल बंद केबलद्वारे वीज वितरण जोडणी करून मिळणार आहे. यासह शासनाच्या व वीज वितरण कंपनीच्या विविध योजनांची माहिती देऊन थकबाकीदारांना वेळेवर वीज बिल भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले.
वीज कंपनीतर्फे प्रकाशा येथे मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST