यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. खानोलकर यांनी गावच्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्तींनी व्यक्तिगत पातळी ते सामाजिक पातळी पर्यंतच्या आव्हानांना कसे सामोरे जावे यावर संवाद साधला.
प्रसंगी त्या म्हणाल्या की, अंगणवाडी हे केवळ पोषण आहार पुरवठा केंद्र किंवा कुपोषण निर्मूलन पर्यंत मर्यादित न राहता त्या माध्यमातून मूल्यशिक्षण आणि चांगल्या सवयी या उद्देशालाही प्राधान्य देण्यात यावे. एखादी अंगणवाडी एका गावाला कोणत्या पद्धतीने जोडू शकते, त्याची ताकद काय आहे. यावर घेतलेल्या चर्चेत महिलांनी गावात स्वच्छतेच्या कामात गावाला एकत्र आणले तर मोठा बदल होताे. प्रत्येकीने आपल्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. आणि त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला स्वतच्या मनाची पक्की तयारी असू द्यावी.
२०१७ पासून जिल्ह्यात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ठराविक ग्रामपंचायतीत ग्राम परिवर्तनाचे काम चालू आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत पूर्वी ग्राम परिवर्तकांची नियुक्ती करण्यात आली होती. विविध प्रकारच्या १८ शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर काम करणे हे अभियानाचे उद्देश होते. या अभियानाचे स्वरूप आता बदलले असून तालुका स्तरावर समन्वयकांच्या माध्यमातून हे काम सुरु असल्याची माहिती दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली.
दरम्यान या कार्यशाळांच्या माध्यातून ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यात नवापूर तालुक्यात अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदे रिक्त आहेत. यामुळे एका पर्यवेक्षिकेला १०० ते १०० पदांचा भार सांभाळावा लागत आहे. यामुळे पर्यवेक्षिकांना त्या-त्या अंगणवाड्यांना भेटी देता येत नसल्याची माहिती देण्यात आली.
धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी माल वाहतुकीच्या समस्या मांडल्या. दरम्यान कार्यशाळेत अंगणवाडी सेविकांनी पालकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याने त्या मुद्द्यावर लक्ष देत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांनी ही सहभाग नोंदवला.