लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्र शासनाच्या एनआरसी व सीएए कायद्याच्या समर्थनार्थ शनिवारी शहरातील नागरिकांनी विराट रॅली काढली. या वेळी प्रशासनाला समर्थनाचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, आयोजकांनी १५० मीटर लांब तिरंगा हातात घेतला होता. त्यामुळे तिरंगाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.राष्ट्रीय सुरक्षा मंच, जय श्रीराम सोशल ग्रुप व तळोदेकर नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ शहरातून विराट रॅली काढण्यात आली. या दोन्ही कायद्यांबाबत अपप्रचार केला जात आहे. या कायद्यांमुळे बांगालदेश, पाकीस्तान, अफगाणिस्तानातील शरणार्थी भारतीयांना देशाचे नागरिकत्व मिळणार आहे. त्यामुळे हा कायदा कोणत्याही एका समुदायाविरोधात नाही. या कायद्यांच्या समर्थनार्थ शनिवारी येथे रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात शहरातील हातोडा रस्त्यावरील दत्तमंदिरापासून करण्यात आली. मेनरोड, स्मारक चौक, हुतात्मा चौकमार्गे तहसील कार्यालयात रॅली नेण्यात आली. तेथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. रॅलीतील युवकांनी विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. याशिवाय युवकांनी १५० मीटर लांबीचा तिरंगा झेंडा रांगेत धरला होता. या झेंड्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल दीड-दोन तास ही रॅली चालली. रॅलीतील युवकांच्या भारत मातेच्या जयघोषाने तळोदा शहर दणाणले होते. नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना नागरिकांतर्फे या कायद्यांच्या समर्थनाचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर अॅड.भरत मराठे यांनी एनआरसी व सीएए कायद्याबाबत मार्गदर्शन केले. आमदार राजेश पाडवी व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरीयांनी केंद्र शासनाच्या बिलाचे समर्थन करुन त्याविरोधात काँग्रेस व विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराबाबत टिका केली. या कायद्यामुळे देशातील घुसखोरीला आळा बसणार आहे.रॅलीत नगराध्यक्ष अजय परदेशी, राजेंद्र राजपूत, कैलास चौधरी, शिवसेनेचे जितेंद्र दुबे, गौतम जैन, विपुल कुलकर्णी, आनंद सोनार, प्रा.विलास डामरे, शिरीष माळी, माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे, उपाध्यक्ष प्रा.सुधीर माळी, प्रसाद सराफ, जगदीश परदेशी, भैय्या चौधरी, पुतन दुबे, संजय वाणी, संतोष माळी, विजय सोनवणे, विजयसिंग राणा, रसिकलाल वाणी, कौशल सवाई, अनुप उदासी, भास्कर मराठे, अॅड.संदीप पवार, नितीन पाडवी, जालंधर भोई, रामा ठाकरे, सुरेश पाडवी, राजू पाडवी, हिरालाल पाडवी, योगेश पाडवी आदींसह नागरिक सहभागी झाले होते. रॅली यशस्वीतेसाठी श्रीराम ग्रुप व मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तळोदा येथे राष्ट्रीय सुरक्षा मंच, जय श्रीराम सोशल ग्रुप व तळोदेकर नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत तळोदा शहरातील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने, हातगाड्यांवरील व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यामुळे शहराची बाजारपेठ ठप्प झाली होती. रॅली संपल्यानंतर व्यावसायिकांनी आपली दुकाने पुन्हा सुरू केली होती.