लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याने चांगले काम केले आहे. जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांनी एकजुुटीने प्रयत्न करावा असे आवाहन पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालात आवश्यक नवीन पाच डायलिसीस यंत्र खरेदीसाठी निधीची तरतूद करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते. अॅड.पाडवी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर संसर्ग जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी या क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. बाहेर फिरताना मास्क वापरणे बंधनकारक करावे. पोलीस, रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीदेखील कर्तव्य बजावताना विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.शासनाने बाहेरील जिल्ह्यातून मजूरांना परत आपल्या जिल्ह्यात येण्याची अनुमती दिली असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी. सीमेवर येणाºया प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. महाराष्ट्रातील विविध भागात गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना आणण्यासाठी त्यांची माहिती संकलीत करावी व त्यांच्या वाहतूकीसाठी वाहन व्यवस्था करावी. आदिवासी विभागातर्फे यासाठी निधी देण्यात येईल. बाहेरून येणाºया व्यक्तीला होमक्वॉरंटाईन करण्यात यावे. त्यांना एप्रिल महिन्याचे धान्य त्वरीत उपलब्ध करून द्यावे.बँकेतील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा उपयोग करावा. बँकेने जनतेला माहिती देण्यासाठी ध्वनीक्षेपकाचा उपयोग करावा. स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन जनतेला माहिती देण्याची व्यवस्था करावी. उन्हापासून बचावासाठी बँकेबाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात यावी. ग्राहक सुविधा केंद्र किंवा पोस्टाच्या माध्यमातून अधिकाधीक व्यवहार होतील याचे नियोजन करावे. कोविड-१९ बाबत आरोग्य विभागाच्या निदेर्शांचे कडकपणे पालन करावे. नागरिकात हात धुण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंगबाबत जागृती करण्यात यावी. जिल्ह्याने संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून जिल्हा पुन्हा एकदा ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्य वितरण वेगाने व्हावे आणि गैरप्रकार करणाºया दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा रुग्णालयाला आवश्यक नवीन पाच डायलिसीस यंत्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.