मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा नगरपालिकेला मागील काही दिवसांपासून जनतेच्या आरोग्याची कोणतीही काळजी दिसत नाही. मागील २३ तारखेपासून घनकचरा व्यवस्थापनाचे काम ज्या संस्थेला देण्यात आले होते त्या संस्थेची कामाची मुदतही संपली आहे. जेव्हापर्यंत नवीन ठेका दिला जात नाही? तेव्हापर्यंत त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देऊन हे साफसफाईचे काम देता येत नव्हते का? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देता येऊ शकते? रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ देता येऊ शकते? मग लोकांच्या हितासाठी काम करणाऱ्या स्वच्छता ठेकेदाराला मुदत वाढ का? देण्यात आली नाही? असे प्रश्न निवेदनात नमूद केले आहेत.
पावसाळ्याचे दिवस जवळ येऊनही आतापर्यंत नाले सफाई करण्यात आलेली नाही. तळोदा शहरातील जनतेचे आरोग्य हे सध्या रामभरोसेच आहे. नगरपालिका पाऊस पडल्यानंतर आणि जोपर्यंत लोकांच्या घरात पाणी घुसून लोकांचे आरोग्य धोक्यात येत नाही तोपर्यंत नाले सफाई करणार नाही. शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. घंटागाडी दर दोन दिवसांनंतर येते, मग लोकांनी साठवलेला कचरा हा कुठे टाकावा? असा प्रश्नही निर्माण होतो. म्हणून योग्य असे नियोजन करून लोकांना आरोग्याविषयी काही अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन शिवसेनेचे तळोदा शहरप्रमुख जितेंद्र दुबे, शहर संघटक विनोद वंजारी, संजय पटेल, युवासेना शहरप्रमुख जगदीश चौधरी, श्रावण तिजवीज, विजय मराठे, दीपक मोरे, नितीन ठाकरे, आदींनी दिले.