स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कमाल आणि किमान
तापमान कमी होऊन कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान ढगाळ राहील. शेतकरी बांधवांनी पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी एवढा पुरेसा पाऊस झाल्यानंतर तसेच ४ ते ५ इंच एवढी ओल झाल्यास व वाफसा आल्यानंतर खरीप पिकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. शेतात काम करताना आपल्या भागात पडणाऱ्या विजांपासून संरक्षणासाठी आणि
पूर्वसूचना मिळवण्यासाठी प्ले स्टोर मधून “दामिनी” ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन
डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक भागात तुरळक ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण सर्वच भागात सारखे नाही. शिवाय अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांना सुरुवात नाही. अवघ्या १४ हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र पावणेतीन लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करणे योग्य असते. तरच पिकांची उत्पादकता व उत्पादन चांगले येते. परंतु यंदा १० जुलैपर्यंत देखील पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने १५ जुलैपर्यंत पेरण्या होणे शक्य नाही. त्यामुळे यंदा पेरण्या लांबणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. कमी कालावधीच्या पिकामुळे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झालेला आहे. काही तालुक्यात बऱ्यापैकी तर काही तालुक्यात अगदीच कमी पाऊस झाला असल्याने पावसाचा असमतोल देखील कायम आहे. गेल्यावर्षी १० जुलैपर्यंत सरासरीच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला असल्याचे चित्र आहे.