ब्राह्मणपुरी : कर्ज थकविणाऱ्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. ही थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे; परंतु नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम सरकार देणार होते; परंतु त्याबाबत केवळ घोषणाच असल्याने प्रत्यक्षात कृती होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आता थकबाकीदार व्हावे का? अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.
शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली बाब आहे. मात्र, याचवेळी जे नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. केवळ मधूनमधून घोषणा करीत असतात. या घोषणांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये साह्य केले जाईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. त्यामुळे आम्हालाही थकबाकीदार शेतकरी व्हावे लागेल, अशा संतप्त भावना नियमितरीत्या कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी हे श्रीमंत शेतकरी आहेत असा समज शासनाचा आहे काय? नियमित कर्ज फेडणारे शेतकरी केवळ कर्जाची आलटपालट करतात. त्यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांचा विचार करून अमलात आणाव्यात.
शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन योजना चालू केली होती; परंतु प्रोत्साहन योजना ही फसवी योजना ठरत आहे. म्हणून शेतकरी वर्ग पैसे भरण्यासाठी विचार करीत आहे.
- सुभाष तुकाराम पाटील, शेतकरी, गोगापूर, ता.शहादा.
सद्य:स्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी गेलो असता शेतकरी म्हणतात की, प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान आमच्या खात्यावर जमा करावे व बाकी पीककर्ज रक्कम आम्ही भरण्यास तयार आहोत. शासनाकडून ५० हजार रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणजे नियमित वसुलीसाठी अडचणी येणार नाहीत.
-जयदेव पाटील, चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, गोगापूर, ता. शहादा.