नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असतांना दुसरीकडे म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात तातडीने स्वतंत्र उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे. आवश्यक औषधी साठा देखील उपलब्ध झाला आहे. दरम्यान, हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना आता म्युकरमायकोसिस आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अनेकांचे दात काढले गेले, डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे. उपचारासाठी लागणारा अवाढव्य खर्च यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. यासाठी शासकीय उपचार सेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. सद्य:स्थितीत जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात सोय करण्यात आली असली तरी या आजारावरील उपचाराची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी होत आहे.