७ जूनला पाऊस झाला तेव्हा थोड्या शेतकऱ्यांनी लागवड तसेच पेरणी केली होती. काही शेतकऱ्यांनी दुसऱ्या पावसाची वाट पाहत नंतर पेरणी आणि लागवड करू, असा विचार केला होता. मात्र, सात जूननंतर पाऊस लांबल्याने आता कुठेतरी शहादा परिसरात काही गावांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लागवड तसेच पेरणीची सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ७ जूनला लागवड तसेच पेरणी केली होती, अशा ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नवीन लागवड करावी लागली. शेतकऱ्यांनी उधार उसनवारीने पैसे गोळा करून बी-बियाणे घेतले होते. मात्र, त्यातही पावसाने दगा दिल्यामुळे लागवडीसाठी दरवर्षापेक्षा दीडपटचा खर्च शेतकऱ्यांना लागत आहे. शिवाय आता खूप उशिराने पेरणी व लागवड होत असल्याने उत्पन्नातही घट होणार आहे.
कोरोना महामारीमुळे सगळे उद्योग-धंदे, व्यवसाय ठप्प, शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडे भांडवलासाठी स्वतःचा पैसा तर उपलब्धच नाही. शिवाय पाऊसही चांगला होत नसल्याने सावकारही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आयुष्यभर राबराब राबून जगाचा पोशिंदा नेहमी आर्थिक संकटात येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.