यावेळी उपभियंत्यासही शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबून ठेवले होते. शेवटी कृषीपंपाचे चालू बिल म्हणजे पाच हजार रुपये भरण्यावर तोडगा निघाल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या मागे घेतला. दरम्यान, चालू वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती. तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचे साधारणत साठ कोटी रुपयांचे वीज वितरण कंपनीचे वीजबिल बाकी आहे. ५० टक्के बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची कृषीपंपाची वीजजोडणी कट करण्याची कार्यवाही येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सरू केली आहे. अजून शेतकऱ्यांची पिके शेतातच उभी आहेत. शिवाय कुठलाही हंगाम नसताना कनेक्शन कट करण्याची मोहीम वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्यामुळे बोरद परिसरातील मोहिदा, खरवड, मोड, तऱ्हावद, खेडले, तळवे, मोरवड, लाखापूर या गावांमधील सुमारे १५० शेतकऱ्यांनी गुरुवारी वीज कंपनीचे बोरद येथील कार्यालय गाठून सकाळी नऊ वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल तीन तास कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला होता.
यावेळी कार्यालयाचे अभियंता गुरव यांनाही शेतकऱ्यांनी कार्यालयात डांबून ठेवले होते. त्याचवेळी तळोदा कार्यालयाचे उपविभागीय उपअभियंता प्रदीप चाहांदे घटनास्थळी दाखल झाले. शेतकरी तीन हजार रुपये बिल भरण्यावर ठाम होते तर कंपनीचे अधिकारी पाच हजार रुपये भरावे किंवा चालू बिल भरावे यावर ठाम होते. बुधवारी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे वीजबिल भरावे, अशी अट अधिकाऱ्यांची होती. त्यामुळे शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच गरमागरमी सुरू होती. येथील वातावरण अधिकच तंग बनले होते. शेवटी शहादा विभागाचे अधीक्षक अभियंता किसन पावरा यांच्याशी अधिकारी व शेतकऱ्यांनी संवाद साधला. त्यानंतर चालू वीजबिल अथवा पाच हजार रुपये भरण्याचे निश्चित झाल्यानंतर ठिय्या मागे घेतला.