नंदुरबार : जिल्ह्यातील ५५ हजार कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडे वीज कंपनीचे २५८ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीची वसुली पुन्हा सुरु झाली असून बऱ्याच ठिकाणी कंपनीने योग्य ते बिल देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. यानंतरही कंपनी वसुलीसाठी तगादा लावत आहे.
वीज कंपनीच्या नंदुरबार आणि शहादा अशा दोन विभागात शेती पंपांसाठी स्वतंत्र वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. गेल्या १० वर्षात या कृषीपंपांची थकबाकी ही कोट्यवधी रुपयांच्या घरात गेली आहे. यात कृषीपंपधारक शेतकरी हे योग्य त्या प्रकारचे बिल मिळत नसल्याने भरणा करु शकत नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान याबाबत वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्यासोबत संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. परंतु जिल्ह्यात कृषीपंपधारकांकडून योग्य पद्धतीने वीज बिल वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना योग्य त्या पद्धतीने कंपनीने बिले दिली पाहिजेत. वेळोवेळी बिले नसल्याने शेतकरी व वीज कंपनी यांच्या खटके उडत आहेत. शेतकरी रक्कम भरण्यास तयार असतात परंतु कंपनीकडून योग्य त्या पद्धतीने कारवाई करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना किती व कसा वीज वापर झाला याची माहिती दिली पाहिजे.
-प्रविणसिंग भटेसिंग राजपूत, शेतकरी.
सातत्याने बिलांची वसुली करण्याबाबत कार्यवाही करण्यात येते. परंतू वीज बिले मात्र दिली जात नाहीत. यंदा मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर वसुली सुरु होणार असल्याची माहिती आहे. यातून बिले देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु ही बिले नेमकी कोणत्या कालावधी व किती वापराची देणार याबाबत कंपनी बोलत नाही. कंपनीने हे स्पष्ट करावे.
-नंदू काशिनाथ पाटील,शेतकरी,
वीज कंपनीला सर्वच शेतकरी सहकार्य करतात. परंतु कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती दिलीच जात नाहीत. कोणताही शेतकरी विजेची थकबाकी ठेवत नाही. परंतू योग्य ते बिल योग्य त्या वेळी मिळतच नाही आणि मिळाल्यास त्यात युनिट वापरात तफावत असते. शेतकऱ्यांना मासिक किंवा त्रैमासिक बिले दिली गेली पाहिजेत.
-राजेंद्रगीर विक्रमगीर गोसावी,शेतकरी.