नंदुरबार : आयान शुगरकडे यावर्षी जिल्ह्यातील १८ हजार हेक्टर ऊस गाळपासाठी नोंद झाला आहे. गेल्या हंगामातील उसाला दोन हजार ४२५ रुपये प्रतिटनचा भाव दिला असून, ९० टक्के शेतकऱ्यांची रक्कम दिली आहे. कोरोनामुळे १० टक्के शेतकऱ्यांची रक्कम थकीत असून, तीदेखील ७ जुलैपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याने दिली आहे.
साखर कारखान्यांतर्फे आगामी हंगामाची तयारीसंदर्भात माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बडगुजर व मुख्य लेखाधिकारी पद्माकर टापरे यांनी सांगितले की, गेल्या हंगामात कारखान्याने एफआरपीचा दर दोन हजार ३२७ असताना शेतकऱ्यांना प्रतिटन दोन ४२५ रुपये भाव दिला आहे. त्यातील ९० टक्के शेतकऱ्यांचे केनपेमेंट अदा करण्यात आले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे १० टक्के शेतकऱ्यांची उसाची रक्कम थकीत आहे. या शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असून, ७ जुलैपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पुढील हंगामातही कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी नियोजन करण्यात आले असून, कारखान्याकडे १८ हजार हेक्टर उसाची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेवर कारखाना सुरू करून नियोजनानुसार शेतकऱ्यांचा ऊस वेळीच गाळप करण्याचे प्रयत्न असून, त्यासाठी आतापासून नियोजन करण्यात येत असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.