याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या एप्रिल व मे महिन्यात खरिपाची तयारी करून शेतकरी वर्गाकडून केळी, पपईची लागवड करण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी विविध एजन्सींमार्फत रोपांची ऑर्डर दिली होती. काही शेतकऱ्यांना मागणीनुसार रोपे उपलब्ध होऊन त्यांनी रोपांची लागवड केली आहे. परंतु ब्राह्मणपुरी येथील शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी गेल्या ६ मे रोजी शहादा येथील पांडुरंग ॲग्रो एजन्सीमार्फत केळीच्या पाच हजार रोपांची मागणी केली होती. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिरोप १५ रुपयाप्रमाणे ७५ हजार रुपयेदेखील जमा केले होते. पांडुरंग एजन्सीतर्फे संबंधित शेतकऱ्याला २५ मे दरम्यान केळीची रोपे उपलब्ध करण्यात येतील व आपली लागवड वेळेवर हाेईल, असे सांगण्यात आले. २५ मे रोजी संबंधित शेतकऱ्यांनी केळी रोपांविषयी विचारणा केली असता, संबंधित एजन्सीतर्फे टाळाटाळ होत होती. महिना उलटूनही रोपे उपलब्ध होत नसल्याने रोपांची लागवड करायची कधी? असा प्रश्न उपस्थित होत असून, उशिरा लागवड झाल्याने केळी पिकाला योग्य भाव मिळणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
एजन्सीमालक आऊट ऑफ कव्हरेज
शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी संबंधित एजन्सी मालकाला केळी रोपांसाठी संपर्क केला असता, फोन उचलत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे संबंधित एजन्सी मालकाने शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वेळेवर लागवड होण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
केळी लागवडीसाठी एप्रिल व मे महिना पोषक वातावरण असते. यासाठी शेतकरी वर्ग कर्ज घेऊन केळी रोप, खत, ठिबक सिंचन आदींच्या तयारीत असतात व लागवड करतात; परंतु काही ॲग्रो एजन्सींकडून शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध न करीत असल्याने शेतकऱ्यांना केळी रोपांची लागवड उशिराने करावी लागते, तर काही शेतकऱ्यांना इतर पीक लागवडीचा आधार घ्यावा लागतो. यासाठी संबंधित कंपन्यांनी एजन्सीमार्फत शेतकऱ्यांना रोपे वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पांडुरंग ॲग्रो एजन्सीला केळी रोपांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यासाठी एकूण ७५ हजार रोख देण्यात आले होते. एजन्सीमार्फत २५ मे दरम्यान रोपे उपलब्ध होणार होती. परंतु महिना उलटूनदेखील रोपे उपलब्ध होत नसल्याने केळी रोपांची लागवड करायची तरी कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.
- मधुकर दशरथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा