शहादा तालुक्यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील असून विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या शेतमालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच पाडळदा येथील सेवानिवृत्त उपअभियंता शरद गोविंद पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेतीचा विचार केला. परंतु पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे त्या ज्ञानाचा वापर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन पाच वर्षांपूर्वी शेती कसणे सुरू केले. त्यात त्यांनी अवगे-जुनवणे शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच एकरात जी-९ वाणाच्या सहा हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली. लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ज्ञांकडून माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली. ही बाग पाहण्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या १२०० रुपयांहून अधिक प्रती क्विंटल दर मिळत असून केळीचा दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केटपेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यालाही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून वाहन भरले जाते. थेट मुंबईला रवाना झाल्यानंतर ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. त्यानंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका सिझनला तालुक्यातून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जातात. शरद पाटील यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत पाच एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत रोपांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विंट्रेक्स क्रॉप केअर या कंपनीचे नंदकुमार पाटील, विनायक धाबुगडे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपायांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. आजपर्यंत लाखो रुपयांची केळी निर्यात केली असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. शेतीत नवखे असूनही आखाती देशात केळी जात आहे, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पाटील सांगतात.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोग करुन शेती कसल्यास आपल्या मालाची परदेशात मागणी होते. त्यातून निश्चितच शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात. भविष्यातही वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी शेती करण्याचा मानस आहे.
-शरद गोविंद पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता, शहादा