मोबाइलचा शोध लागला नव्हता त्याअगोदर ग्रामीण व शहरी भागात ठरावीक लोकांकडे दूरध्वनी कनेक्शन होते. हळूहळू सर्वांकडे दूरध्वनी दिसू लागल्यावर मोबाइलचा शोध लागला. तेव्हा ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यांच्याचकडे मोबाइल दिसत होता. नंतर हळूहळू सगळ्या कुटुंबांमध्ये मोबाइल दिसू लागला. मात्र, आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कोरोना या गंभीर आजारामुळे शाळा-महाविद्यालये चालू करता न आल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शासनाला निवडावा लागला. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मोबाइलची आवश्यकता नव्हती, त्यांच्यासाठीही पालकांना नाईलाजास्तव स्वतःचा मोबाइल द्यावा लागतो. नाहीतर नवीन अँड्रॉइड मोबाइल विकत घ्यावा लागला आहे; पण या ऑनलाइन शिक्षणाचा परिणाम प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालयांत जाऊन जेवढा परिणामकारक होतो. तेवढा परिणामकारक ऑनलाइन शिक्षणाचा दिसून येत नाही. उलट मोबाइलच्या अतिवापरामुळे मुले ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त मोबाइलमध्ये व्हाॅट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या अधिक वापरामुळे मुलांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. कारण दिवसभरातून मोजक्या ऑनलाइन तासिका जॉइन केल्यानंतर मुले नकारात्मक बाबींसाठी अँड्रॉइड मोबाइलचा अधिक वापर करताना दिसून येत आहेत.
ज्यावेळेस शाळा चालू होते त्यावेळेस प्रत्यक्ष मुले वर्गात शिकवीत असताना शिक्षक काय शिकवीत आहेत, याकडे अधिक लक्ष असायचे. तसेच शिक्षकांनी दिलेला अभ्यास घरी वेळेत पूर्ण करून तो अभ्यास शाळेत तपासला जायचा. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षकांनी अभ्यास दिला असला तरी तो पूर्ण होत नाही. शिवाय ऑनलाइन तासिकांमुळे मुले गांभीर्याने शिक्षकांचे शिकविणे मन लावून ऐकत असतीलच, असे नाही. त्यामुळे या मोबाइलरूपी शिक्षणामुळे सध्याची तरुण पिढीचे भविष्यात काय होईल? अशी चिंता पालकांना वाटू लागली आहे. शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात चालू असतात, तेव्हा मनोरंजन म्हणून थोड्या वेळेपर्यंत मुलांकडे मोबाइल दिसून यायचा. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांकडे दिवसभर मोबाइल दिसत असून, त्याचा गैरवापर जास्त होताना दिसून येत आहे.
अशीच परिस्थिती यंदाही वर्षभर राहिली तर सलग दोन वर्षे ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा शैक्षणिक विकास तर होत नाही. मात्र, या ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात लवकर चालू झाले नाही, तर मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांची मानसिकता बदलल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे लागेल, असे दिसून येत आहे.
कोरोना महामारीमुळे सलग दुसरे वर्ष मुलांना ऑनलाइन शिक्षणास सामोरे जावे लागत आहे. मात्र, यामुळे मुलांकडे दिवसभर मोबाइल दिसत असून मुले अभ्यासाव्यतिरिक्त जास्त वेळ अनेक गोष्टी गरज नसताना सर्च करतात अथवा पाहत असतात. नाहीतर गेम खेळत बसतात. त्यामुळे प्रत्यक्षात शाळा कायमस्वरूपी लवकर सुरू झाली नाही तर त्यांच्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे.
-विजय माळी, पालक, जयनगर, ता. शहादा