नंदुरबार : राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप यंदाही संथगतीने सुरू असल्याने जुलैअखेर येऊनही जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ५०० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना राष्ट्रीयीकृत बँका निम्म्यापर्यंतही पोहोचलेल्या नाहीत. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी उधार-उसनवारीने कर्ज घेत पेरण्या करीत आहेत.
जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँक मिळून एकूण ५६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. साधारण एक लाखापेक्षा अधिक शेतकरी खातेदार असताना मात्र जिल्ह्यात दरवर्षी २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होत नाही. यातून शेतकरी खासगी ठिकाणाहून कर्ज घेत पिकांची पेरणी करतात. जिल्ह्यातील २५ हजार २२ शेतकऱ्यांना गेल्या वर्षी महात्मा जोतिबा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत लाभ मिळाला होता. यातून दीड लाख रुपये वजा झाल्याने या शेतकऱ्यांची खाती रिकामी झाली हाेती. लाभधारकांसोबतच नियमित खातेदारांना यंदा कर्ज मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खाती रिकामी झाली असतानाही बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. येत्या काळात शेतीसाठी पैशांची गरज पडणार असल्याने शेतकरी पुन्हा खाससगी सावकारीच्या फाशात ओढला जाण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.
जिल्हा बँक पुढे...
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा ७१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु बँकेने ११ हजार १७२ शेतकऱ्यांना ९७ कोटी २२ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे. उद्दिष्टापेक्षा ३५ टक्के अधिक कर्जवाटप करीत बँकेने नवीन विक्रम केल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीयीकृत बँका फेल
जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांच्या शाखांना यंदा ४९१ कोटी ९२ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, बँकांनी २६ जुलैअखेरपर्यंत केवळ १५० कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे.
केवळ ३० टक्के हे कर्ज वाटप झाले आहे.
२० हजार शेतकऱ्यांना कर्ज : बँकांकडून एकूण २० हजार ६०६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात ११ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने, तर ९ हजार ४३४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप केले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पीक कर्जवाटपाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांकडून कायम उदासीनता दर्शविण्यात येते. यातून जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ २४७ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ११७ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकेच्या शाखांमधून ३ कोटी ७१ लाख, तर खासगी बँकांकडून २७ कोटी ३४ लाख रुपयांचे पीक कर्ज दिले गेले आहे. या सर्वात राष्ट्रीयीकृत बँकांची टक्केवारी ही २९ टक्के असून, सर्व बँकांच्या तळाशी राष्ट्रीयीकृत बँकांचा क्रमांक येत असल्याचे समोर आले आहे.