लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांच्या निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.हे नियंत्रण कक्ष जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून, तेथून मिळालेल्या आदिवासी व्यक्तिंच्या माहितीच्या आधारे वाहन व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी तळोदा आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालय परस्पर समन्वयाने कार्य करीत आहे. राज्यातील तसेच परराज्यात असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांची माहिती संकलनाचे कामदेखील करण्यात येत आहे.या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा यांच्या समन्वयातुन तालुका निहाय सहा कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन्ही प्रकल्पातील ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वांना तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे, तसेच जेथे बस जाणार नाही तेथे खाजगी वाहनाद्वारे मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येणार आहे.नियत्रंण कक्षात नंदुरबार, नवापुर व शहादा तालुक्यासाठी समन्वय अधिकारी सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून प्रदीप देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा व धडगावसाठी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात किंवा परराज्यात स्थलांतरीत अथवा लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या आदिवासी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
स्थलांतरीत मजुरांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:24 IST