लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरसेवक पुत्राच्या विवाहानिमित्त दिलेल्या जेवनावळीत नियमांचे उल्लंघन झाले किंवा कसे याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली आहे. कुणाकडे यासंदर्भात काही पुरावे असल्यास समितीशी संपर्क साधावा असे आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.नंदुरबार येथे विवाहाप्रित्यर्थ आयोजित मेजवानीच्या वेळी ५० व्यक्तींचा उपस्थितीचा मर्यादेचा भंग झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले असल्याने प्रस्तुत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांची संयुक्त चौकशी समिती नेमली आहे.मेजवानीत स्वयंपाक करणारा खानसामा पॉझिटीव्ह आढळून आला आहे आणि अनेक नागरिक सहभागी झाल्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. खानसामाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना करोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मेजवानीत सहभागी झालेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंनी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागामार्फत तात्काळ तपासणी करून घ्यावी.नागरीकांना अशा व्यक्तींची माहिती असल्यास किंवा मेजवानीचे कुठल्याही प्रकारचे छायाचित्रण अथवा व्हिडीओ उपलब्ध असल्यास तहसील कार्यालय नंदुरबार किंवा उपविभागीय कार्यालय नंदुरबार येथे सादर करावे. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही वसुमना पंत यांनी केले आहे.
जेवनावळीच्या चौकशीसाठी प्रांताधिकारींची समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:58 IST