ब्राह्मणपुरी : लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. परंतु मागणीनुसार डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद ठेवावे लागते. तसेच आठवड्यात दोन-तीन दिवस लसीकरण केंद्र सुरू ठेवावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण झाले होते. त्यासाठी प्रशासनाने विविध युक्त्या वापरत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती होऊन नागरिकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या १८ वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्याचबरोबरीने ४५ च्या वर वयोगटातील वृद्धामध्ये भीती होतीदेखील होते. परंतु तरूणांमधला उत्साह पाहून लसीकरणाला पुढे येत असल्याचे चित्र आहे. परंतु मागणीनुसार डोस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.
दोन डोसमधले अंतर संपूनही दुसरा डोस वेळेत मिळत नसल्याने सकाळपासून लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहूनदेखील लसीअभावी माघारी फिरण्याची वेळ अनेकदा नागरिकांवर येते. तालुक्यातील लसीकरण उपकेंद्रांवर अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, उपकेंद्रात ५० ते ६० डोस उपलब्ध होत असून, २०० हून अधिक नागरिकांनी डोस घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र लस संपल्याने अनेक नागरिकांना हात हलवीत माघारी परतावे लागत आहे.