नंदुरबार : शहरातील साक्री नाका ते दंडपाणेश्वर रस्त्यावर अमरधामच्या वळणावर एकाने अनधिकृत अतिक्रमण केले असून ही जागा अंत्ययात्रांच्या विसाव्याची आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
परिसरातील नागरिकांनी दिलेल्या या निवेदनात, नंदुरबार नगरपालिकेचे अमरधाम हे साक्री नाका ते दंडपाणेश्वर मार्गावर आहे. नवापूर चाैफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत विसाव्याच्या जागी विनापरवानगी साधारण ४० फूट जागेवर एका व्यक्तीने टपरीवजा शेड तयार करून व्यवसाय थाटला आहे. पाताळगंगा नदी किनारी तयार करण्यात आलेल्या या शेडमध्ये रसवंतीचा व्यवसाय सुरू आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचे परवाने नसताना संबंधिताने याठिकाणी व्यवसाय सुरू केले आहेत. याठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीही सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान परवाने नसताना मात्र संबंधिताने याठिकाणी वीजपुरवठाही घेतला आहे. वीज कनेक्शनसाठी वीज कंपनीकडून परवाना घेतला किंवा कसे याची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले हे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.
अचानक उभ्या राहिलेल्या या शेडमुळे आश्चर्यही व्यक्त करण्यात येत होते. परंतु कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे व्यस्त असलेल्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर हा प्रकार गंभीर असल्याचे समोर आले आहे.