नंदुरबार : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ८६ पैकी ६४ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पार पडला होता. यासाठी १ हजार २७१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
डिसेंबर २०२० पासून जिल्ह्यात ८६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, २२ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होता. यासाठी प्रशासनाला ४० लाख रुपयांचा खर्च करावयाचा होता. या खर्चाची पूर्तता निवडणूक आयोगाला ग्रामविकास विभागाने केल्यानंतर कामकाज सुरू झाले होते. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या खर्चानंतर तालुकास्तरावर हा निधी वितरित करण्यात आला आहे. यांतर्गत कर्मचारी मानधन वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यातील इतर भागात ग्रामपंचायत निवडणूक खर्चाबाबत अनेकविध प्रश्न निर्माण झाले असताना जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर दिलेल्या २३ लाख ५० हजाराच्या निधीतून कर्मचारी मानधन पूर्ण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यासाठी ६ लाख ४२ हजार, शहादा ७ लाख ८८ हजार, नवापूर ४ लाख ८ हजार, तळोदा २ लाख ४ हजार, धडगाव ४ लाख ६७ हजार तर अक्कलकुवा तालुक्यासाठी २९ हजार रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण २३ लाख ५० हजार रुपयांचे वाटपही पूर्ण झाले आहे.