तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस नगरसेविका अनिता परदेशी, कल्पना पाडवी, नगरसेवक सुभाष चौधरी, योगेश पाडवी, रामानंद ठाकरे, अमनोद्दीन शेख, हेमलाल मगरे, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, राजू पाडवी, जालंधर भोई, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पालिका प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
बाजारात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे याकरिता दुकानांचे वर्गीकरण करण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एकाच ठिकाणी चिनोदा चौफुली परिसरात भाजीपाला व फळे विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाजी विक्रेते चंद्रशेखर चव्हाण यांनी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना होत नसल्याने व्यापाऱ्यांचे हाल होत असल्याचे बोलून दाखवले. लॉरी उपलब्ध नसल्याने खाली दुकान लावता येत नाही, मंडप आदींची व्यवस्था नसते. गेल्यावर्षी पालिकेकडून जागा भाडे म्हणून १० ऐवजी २० रुपयांची आकारणी केली होती. पालिकेने यंदा भाडेबाबत सवलत देणे गरजेचे असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. नगराध्यक्षांनी यावर उत्तर देत पालिकेकडून यावेळी पावती दिली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच मंगळवारपासूनच दुकानाचे स्थलांतर करून चिनोदा चौफुलीवर लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र आवश्यक त्या उपाययोजनेसाठी वेळ देण्याची मागणी यावेळी विक्रेत्यांनी केली. त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून पालिकेकडून नियमावली आखून आवश्यक उपाययोजना करून या दुकानदाराना जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांनी सूचना केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी यावेळी सांगितले.
शहरात बॅरिकेटींगचा विचार
सकाळच्या सुमारास तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या भागांना भेटी दिल्या. शहरात सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्य रस्ते बॅरिकेटिंग करण्यासंदर्भात यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा झाली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनदेखील गेल्यावर्षी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असल्याने वाहने लावून बाजारासाठी नागरिकांनी पायी यावे यासाठी बॅरिकेटिंग करणे अत्यावश्यक असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.