नंदुरबार : जिल्ह्यात दुकानाबाहेर ठेवलेल्या खाद्यतेलाच्या टाक्या चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. याबाबत टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे. शहादा येथील किराणा दुकानाच्या बाहेरून पुन्हा ४९ हजार रुपयांचे तेल चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, शहादा येथील मोहन किराणा दुकानाच्या बाहेर दुकानदार नैनाराम दुर्गाराम चौधरी यांनी सोयाबीन तेलाच्या टाक्या ठेवल्या होत्या. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी दोन टाक्या चोरून नेल्या. त्यांची किंमत ४९ हजार ३२९ रुपये इतकी आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत नैनाराम दुर्गाराम चौधरी यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मेहेरसिंग वळवी करीत आहे.
दरम्यान, खाद्य तेलाचे भाव गेल्या दोन ते तीन महिन्यांत २० ते ४० रुपये लिटरमागे वाढले आहेत. सद्या १४० ते १६० रुपये रिफाईंड तेलाचे भाव आहेत. हीच संधी साधून चोरट्यांनी आता तेल चोरीकडे मोर्चा वळविला आहे. नंदूरबार, शहादा, तळोदा शहरासह ग्रामीण भागात अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेल चोरीची टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा टोळीचा छडा लावावा व व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.