केंद्र सरकारने जाहिरातबाजी करीत उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व दारिद्र्य रेषेखालील वर्गातील महिलांना मोफत गॅस जोडणी दिली. मोफत गॅस सिलिंडर दिल्याने या कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे रॉकेलचा पुरवठा कायमस्वरूपी बंद केला. परिणामी तालुक्यात झिरो केरोसीन अशी परिस्थिती आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून वर्षभराच्या कालावधीत गॅस सिलिंडरच्या किमती २३० रुपयांपर्यंत वाढल्या व यावर मिळणारे अनुदानही बंद झाले. गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने त्यांना रिफिलिंग परवडेनासे झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात कुठलाही उद्योगधंदा नाही परिणामी अनेक महिला या शेतमजूर म्हणून काम करतात व मोलमजुरी करून आपला कुटुंबीयांचा चरितार्थ चालवतात. वर्षभरात विविध कारणांमुळे कामधंदे बंद पडले , मजुरी मिळेनाशी झाली. यामुळे अगोदरच कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले असून अशा परिस्थितीत गॅसची दरवाढ झाली. त्यामुळे नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी पैसे कोठून आणावेत? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. गॅस सिलिंडर मिळाल्याने रॉकेल ही बंद झाले आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेने रॉकेल हिरावले तर महागाईने गॅस हिरावला, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गॅस व रॉकेल अभावी अनेक घरात चुली पेटू लागल्या असल्याने ग्रामीण भागात पुन्हा सरपण म्हणून लाकडाचा वापर वाढला आहे. केंद्र शासनाने किमान उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर घेण्यासाठी सबसिडी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सिलिंडरच्या दरवाढीमुळे गृहिणींची पुन्हा चुलीकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST