नंदुरबार शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असल्याने रिक्षा चालकांची संख्या ही ५०० च्या घरात गेली आहे. प्रवासी संख्या आणि प्रवासी मार्ग यांच्यात वाढ झाल्याने सर्वांनाच दिवसभरात दोन ते तीन हजार रुपयांची कमाई होत आहे. रिक्षाचा दिवसाचा मेंटेनन्स, इंधन दर यामुळे दिवसाला खर्च काढून घरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढी रक्कम त्यांच्याकडून गोळा करण्यात येत होती. परंतु गेल्या काही दिवसात इंधनदरवाढीमुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होऊन आवक मात्र कमी झाली आहे. यातून मार्ग काढत काहींनी विद्यार्थी वाहतुकीचा तर काहींनी चारचाकीवर चालक म्हणून पार्टटाईम काम करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे तीन चाकी रिक्षासोबतच शहरापासून २० किलोमीटर लांब असलेल्या गावांदरम्यान रिक्षा चालवणाऱ्यांचेही हाल होत आहेत. या रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांकडून त्यांना साथ देण्यात येत असून ग्रामीण भागातील रिक्षा चालकांचे कुटुंब शेतात मजुरीला तर शहरी भागातील कुटुंबे घरगुती कामे करत आहेत. यात कोणी मेस चालवणे, शिलाई काम तसेच चहाची टपरी चालवत आहेत.
व्यवसायावर परिणाम
इंधन दरवाढ झाल्याने रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वाढीव भाडे सांगितल्यास प्रवासी नकार देत त्यांची व्यवस्था करून घेतात. शहरात रिक्षा व्यवसायातही स्पर्धा असल्याने भाडेवाढ करण्याबाबत रिक्षाचालक उत्सुक दिसून येत नाहीत.
इतर कामांचा आधार
रिक्षा चालवणारे बहुतांश जण हे प्रशिक्षित चारचालक असतात. यातून प्रवासी चारचाकी वाहनांवर वर्दी मिळाल्यास दर दिवस या हिशेबाने चालक म्हणून काम करतात. यातून महिन्याकाठी काही पैसे येऊन घराच्या खर्चाला हातभार लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन खर्चात कपात करावा लागतो. रिक्षात पेट्रोल राहिल तर ती चालेल. कुटुंबात पत्नीकडून किरकोळ कामे करून हातभार लागत असल्याने दिलासा आहे. परंतु पुढे काय असा प्रश्न आहे.
-भटू रामराजे, रिक्षाचालक ,
शहरात रिक्षांची संख्या खूप झाल्याने दिवसभरात टाकलेल्या पेट्रोल आणि डिझेलचा खर्च निघणेही मुश्कील होते. अनेकवेळा इतर रिक्षाचालक हे दिवसभर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतात. विद्यार्थी वाहतूक करणारेही त्रस्त आहेत. दिवसभरात खर्च वजा जाता खूप थोडे पैसे रिक्षाचालक घरी घेऊन जातात. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.
-अनिल मराठे, रिक्षाचालक