लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रस्त्याचे काम सुरू असतांना आणि पर्यायी मार्ग पुरेसा नसतांनाही जिल्हा प्रशासनाने जड वाहनांची वाहतूक दोंडाईचा, सारंगखेडा मार्गे न वळविता कायम ठेवल्याने शहरवासी हैराण झाले आहेत. रस्ता काम होईर्पयत जड वाहनांना नंदुरबारात प्रवेशाला बंदी घालावी अशी मागणी होत आहे. नंदुरबारातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम साधारणत: तीन महिने चालणार आहे. पर्यायी मार्ग भोणे फाटा ते राजपूत पेट्रोलपंप असा आहे. परंतु हा रस्ता सिंगल आणि वसाहतींमधून जाणारा असल्यामुळे जड वाहने निघतांना मोठी कसरत होते. शिवाय रहिवाशांना देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठे ट्रक, ट्रॉला यांची वाहतूक दोंडाईचा येथूनच पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी अशी मागणी होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने अध्यादेश काढून किमान तीन महिन्यांसाठी जड वाहनांची वाहतूक वळवावी अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे. यापूर्वी देखील असे अध्यादेश निघालेले आहेत.
जड वाहनांमुळे वसाहतींमधील रहिवाशी झाले बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:10 IST