नंदुरबार : सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यातील २१४ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईच्या झळा सुरू आहेत. एकीकडे प्रशासन कोरोनाला अटकाव करण्यात मग्न असतांना दुसरीकडे दुर्गम भागात पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहेत.
जिल्ह्यात यंदा ९० गावे व २१४ पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नंदुरबार व नवापूर व शहादा तालुक्यातील गावांमध्ये तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु धडगाव तालुक्यातील १८७ व शहादा तालुक्यातील २५ पाड्यांमध्ये तीव्र झळा कायम आहेत. या पाड्यांमध्ये विंधन विहिरी प्रस्तावित असल्या तरी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. त्यातच कोरोना व संचारबंदी असल्यामुळे या कामांना काही ठिकाणी ब्रेक बसला आहे. त्यामुळे अशा पाड्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यात एक कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरून उपाययोजना सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिली.