महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान सुरक्षितता मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे विभाग भांडारपाल यु. जे. चौरे, आगार लेखाकार आर. एस. हजारे, वाहन निरीक्षक जे. आर. पाटील, कार्यशाळा अधीक्षक अशोक वळवी, ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांसारख्या विविध निवडणुकांप्रसंगी आणि गत वर्षात कोरोना काळातदेखील चालक-वाहक यांचे कार्य कौतुकास्पद ठरले. वैद्यकीय अधिकारी, महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रमाणेच चालक - वाहकांनीदेखील जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रत्येक प्रवाशाला एस. टी.चे आजही आकर्षण आहे. एस. टी. चालकाच्या हाती ५० प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी असल्याने सुरक्षिता मोहिमेपुरते मर्यादित न राहता सातत्याने नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असेही थोरात यांनी सांगितले.
याप्रसंगी आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले की, सुरक्षितता मोहिमेअंतर्गत इंधन बचत आणि अपघातविरहीत उपक्रमांना प्राधान्य देण्यात येते. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात नंदुरबार आगारामार्फत शुन्य टक्क्यावर अपघाताचे प्रमाण आणण्याचे प्रयत्न झाले. भविष्यातही चालक - वाहकांच्या मदतीने सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात येईल. तसेच लवकरच आगारातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. सूत्रसंचालन आर. जी. वळवी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत गुजराथी आणि आगारातील सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाला नंदुरबार आगारातील चालक, वाहक आणि कार्यशाळेतील महिला, पुरूष कर्मचारी उपस्थित होते.