ब्राह्मणपुरी : सध्याच्या लॉकडाऊनमध्ये नागरिक हतबल झाले आहेत. हाताला काम नसल्याने त्यांच्यातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. अशा काळात ग्रामीण भागातील नागरिकांनी, महिला वर्गाने पावसाळापूर्व कामाला प्राधान्य देऊन बरीचशी कामे धसास लावली आहेत. यात पापड लाटणे, खारोड्या, कुरवड्या, शेवया याबरोबरच मसाला कुटणे, पावसाळ्यात सरपणाची सोय करणे, शेतीची मशागत करणे, आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
लॉकडाऊनमध्ये पुरुष मंडळी घरीच असल्याने, यावेळी वरील कामांसाठी महिलांना पुरुषांचीही मदत मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये काही महिलांनी पावसाळापूर्व कामे पूर्ण केली आहेत. मेचा उन्हाळा कडक असतो. साहजिकच, या महिन्यात पापड, खारोड्या, कुरवड्या सुकविण्यासाठी चांगले ऊन असते, तसेच मसाला कुटण्याआधी लाल मिरची उन्हातच सुकवून, मग ती कुटण्यासाठी मसाला गिरणीत दिली जाते. त्या व्यतिरिक्त आदिवासीबांधव पावसाळ्यात सरपणाची सोय व्हावी, यासाठी रानात जाऊन सरपण गोळा करून आणत आहेत. शेतीच्या मशागतीलाही वेग आला आहे.
लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नसल्याने अद्याप शेतीच्या मशागतीची कामे थंडावली आहेत. यंदा मजुरांची वानवा असल्याने या समाजाला शेतीच्या मशागतीसाठी मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. आदिवासी बांधव दरवर्षी उन्हाळ्यात रानातील रानमेवा बाजारात विकण्यासाठी आणतात. परंतु, लॉकडाऊनमध्ये यंदा सर्वत्र पाणी फिरले गेले आहे.
कोरोनाने हिरावून घेतली संधी
यंदा ऐन व्यवसायाच्या हंगामात रानमेवा बाजारात कोरोनामुळे येऊ न शकल्याने, कित्येक आदिवासी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मासेमार करणाऱ्या समाजालाही यावेळी फटका बसला. तसेच बाजार हाटवर अवलंबून असलेल्या समाजालाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. या एप्रिल व मे महिन्यांत चांगला व्यवसाय करण्याच्या अनेक संधी असतात. मात्र, या संधीच कोरोनाने हिरावून घेतल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.