नंदुरबार : अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर उशिराने पाऊस झाल्यास पेरणी वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. परंतु, तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून, कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक स्वरूपाचा आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीपूर्व कामे करावीत, खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड, पूर्व मशागतीची कामे करावीत, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८०-१०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.