नंदुरबार : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून एक लाख डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात लसीअभावी काही केंद्रे बंद झाल्याची माहिती होती. दरम्यान यावर कार्यवाही करत आरोग्य संचालक अर्चना पाटील यांच्या आदेशाने २५ हजार कोविशिल्ड तर ५४० कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत.
आरोग्य संचालक डाॅ. अर्चना पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यात भेट दिली. यावेळी त्यांनी नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. याचदरम्यान जिल्ह्यातील काही भागात लसींचा साठा संपून केंद्र बंद पडल्याची माहिती समोर येत होती. यावर मार्ग काढत त्यांनी आरोग्य यंत्रणेसोबत संपर्क केला होता. यातून मंगळवारी जिल्ह्याला २५ हजार डोसचा साठा पुन्हा प्राप्त झाला आहे. यामुळे येत्या काळातील ४५ ते ६०, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या दुसऱ्या लसीचा डोस पूर्णपणे मिळणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यात सध्या ५५ ठिकाणी लसीकरण करण्यासाठी केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांवर दरदिवशी लसींचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान मंगळवारी लसींचा साठा प्राप्त झाल्यानंतर ३ हजार ६१७ जणांना लस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ३५ हजार ९६६ डोस देण्यात आले आहेत. यात प्रथम आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.
दुर्गम भागासाठी विशेष व्यवस्था
सोमवारी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात भेट देणाऱ्या डाॅ. अर्चना पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन.डी. बोडके यांच्याकडून लसीकरणाचा आढावा घेत समाधान व्यक्त केले.
दरम्यान डाॅ. पाटील यांनी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात लसींचा तुटवडा भासू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून आरोग्य यंत्रणेला कळवण्यात आल्यानंतर काही तासात येथे लसींचा साठा पाेहोचता केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे दुर्गम भागातील लसीकरण अविरत सुरु राहील असे त्यांनी म्हटले आहे.