जिल्हा बँकेकडून नंदुरबार जिल्ह्यात यंदा ६५ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. यांतर्गत १ एप्रिलपासून कर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, या कर्ज वाटपात सुसूत्रता यावी, यासाठी बँकेने तात्पुरत्या स्वरूपात एटीएम कार्ड देऊन कर्ज वितरणाची पद्धत अवलंबली आहे. ज्या शेतकऱ्याला पीक कर्ज मंजूर झाले, अशा शेतकऱ्यांची बँकेत फिरफिर होऊ नये, यासाठी त्याच्या खात्यावर रक्कम वितरित करून एटीएमद्वारे पैसे काढण्यावर भर देण्यात येत आहे; परंतु ही बँकेने केलेली सोय शेतकऱ्यांना गैरसाेय ठरत आहे. शेतकरी बँकेच्या एटीएममध्ये कार्ड घेऊन गेल्यानंतर मंजूर झालेली कर्जाची रक्कम बाहेरच येत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत. नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांना हा अनुभव येत असून, जिल्हा बँकेने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेच्या बहुतांश शाखा या ग्रामीण भागात आहेत. याठिकाणी कर्ज मंजूर होऊन रुपे कार्ड मिळाल्यानंतर पैसे घेण्यासाठी शेतकरी थेट शहरांमध्ये धाव घेतात. याठिकाणी पैसे काढण्याचा प्रयत्न करतात; परंतु पैसे न निघाल्यास ते पुन्हा गावाकडे परत जावून बँकेत चाैकशी करून पुन्हा शहरी भागात एटीएमकडे येत आहेत. यातून त्यांचे हाल होत आहेत. जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही पीक कर्ज वितरणाकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार आहेत.
जिल्हा बँकेचा रुपे कार्डचा फंडा यंदाही होतोय फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST