लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जनधन योजनेंतर्गत खाते असलेल्या लाभार्थींच्या खात्यावर केंद्र शासनाने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचे सत्र सुरु केले आहे़ यातून बँकांमध्ये ५०० रुपये काढण्यासाठीही लाभार्थींची गर्दी होत असून नंदुरबार शहरातील बँकांमध्ये यामुळे सोशल डिस्टिन्सिंगची एैशीतैशी झाल्याचे दिसून आले़केंद्र शासनाने कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर देशातील गोरगरीब नागरिकांनी काढलेल्या जनधन योजनेच्या खात्यात ५०० रुपये देण्याचे जाहिर केले होते़ यानुसार सोमवारपासून प्रत्येक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे़ आॅनलाईन पद्धतीने टाकण्यात आलेल्या रकमेची माहिती खातेदारांना मोबाईलवर मिळत असल्याने शहरी हद्दीतील बँकांमध्ये सोमवारपासून गर्दी वाढू लागली आहे़ जिल्ह्यात तब्बल ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व ६२ शाखांमध्ये गर्दी वाढत गेल्याने अखेर पोलीस बंदोबस्त लावून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे़ दरम्यान बँकांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेत लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाला पत्र दिले होते़ या पत्रातून बँकांमध्ये गर्दी वाढणार असल्याचे स्पष्ट करण्यात येऊन त्यानुसार बंदोबस्त देण्याचे सूचित करण्यात आले होते़ मंगळवारी गर्दी वाढण्याचे संकेत असताना नंदुरबार शहरातील बॅकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करुनही पैसे काढणारे गर्दी करत असल्याने सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले़ जिल्ह्यातील जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिक खातेदारांकडे एटीएम नसल्याने त्यांना बँकेत येऊन पैसे काढावे लागत असल्याने येत्या दिवसात गर्दी आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान राष्ट्रीय, खाजगी आणि कोआॅपरेटीव्ह बॅकांकडून जिल्ह्यातील विविध भागात लावण्यात आलेल्या सुमारे १०२ एटीएम दैनंदिन कॅश भरणा करण्याचे आदेश काढले असल्याने त्यानुसार सुरळीतपणे कामकाज होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ आजघडीस सर्वच एटीएममध्ये कॅश असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे़ कॅश पुरवठा करणारी सर्व वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून ग्राह्य धरली गेली असल्याने त्यांच्या वाहतूकीतही अडथळे येत नसल्याचे सांगण्यात आले आहे़ येत्या १४ एप्रिलपर्यंत आणि त्यानंतरही सुरळीत कॅश वितरण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे़
नंदुरबार जिल्ह्यात ५ लाख १७ हजार नागरिकांची जनधन खाती आहेत़ यात २ लाख ७२ हजार महिला तर २ लाख ४५ हजार पुरुष खातेदार आहेत़ आधारला जोडलेल्या या खात्यांमध्ये पैसे पडल्याची माहिती प्रत्येकाच्या मोबाईलवर मिळाली होती़ जिल्ह्यात ११ राष्ट्रीयकृत बॅकांनी काढलेल्या या खात्यांमुळे त्यांच्या शाखांमध्ये गर्दी होणे संभावित होते़ शहरी भागातील सर्व बॅकांच्या शाखांमध्ये मोठी गर्दी झाल्यानंतर पोलीसांनी खातेदार महिला आणि पुरुषांना समज दिली होती़ परंतू यानंतरही गर्दी कायम असल्याचे दिसून आले़ काही बॅकांनी प्रवेशद्वार बंद करत एकावेळी पाच जणांनाच आत प्रवेश दिल्याने गोंधळ कमी झाला होता़ परंतू बाहेरील रांगा ह्या २०० मीटरपर्यंत लांबल्याचे दिसून आले़जिल्ह्यातील सर्व बॅकांच्या जनधन खात्यात २५ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे़ शहरी भागात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस असले तरी ग्रामीण भागात मात्र दुर्दशा असल्याचे चित्र आहे़
४शहरातील अंधारे चौक, घी बाजार, स्टेट बँक चौक, अमृत चौक यासह विविध ठिकाणी असलेल्या बॅकांमध्ये सकाळी ९ वाजेपासून गर्दी झाली होती़ शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले होते़ बऱ्याच जणांकडे मास्क नसल्याने त्यांना रुमाल बांधण्याच्या सूचना करण्यात येत होत्या़ग्रामीण भागात सध्या सोशल मिडियातून बँकेतून पैसे काढण्यासंदर्भात विविध मेसेज व्हायरल झाले आहेत़ यात प्रामुख्याने बँकांमधून पैसे काढण्याच्या तारखा दिल्या जात आहेत़ यातून त्या तारखेनंतर पैसे मिळणार नसल्याचा समज होत असल्याने वेळेपूर्वी गर्दी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे़