कोरोनामुळे शेतीचे नुकसान व शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच तालुक्यातील शेल्टी, पळसवाडा, वर्ढेटेंभे, बिलाडी, बामखेडा, नांदरखेडा या परिसरात शेकडो एकर क्षेत्रातील उस पिकावर पांढरी माशी, मावा, चिक्की आदी रोगराई पसरू लागली आहे.त्यामुळे उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकरी चिंतीत आहेत. उसाच्या पानांवरील किटक अंगावर येत असल्याने मजुरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. फवारणी करण्यासाठी मजूरही नकार देत आहेत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा भविष्यात कापूस, पपई या पिकांनाही हानीकारक ठरू शकतो. याबाबत शेतकऱ्यांनी परिसरात असलेल्या साखर कारखान्याच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती द्यावी व या रोगराईपासून पीक कसे मुक्त होईल याबाबत त्वरित मार्गदर्शन करून उसाचे उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
शेल्टी, ससदे परिसरात उसाच्या पानांवर पांढरी माशीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. परिसरातील साखर कारखाने व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांचा ऊस वाचवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा आहे.
-किशोर रामू पाटील, शेतकरी, शेल्टी, ता.शहादा