बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावित, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अशासकीय सदस्य बबिताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी, हरी पाटील, सविता जयस्वाल, पंचायत समिती सभापती प्रकाश गावित, यशवंत ठाकरे आदी उपस्थित होते.
खासदार गावित म्हणाल्या, ‘जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या १०० टक्के घरांना शुद्ध पाणी देण्यासाठी नियोजन करावे. पहिल्या टप्प्यात दिलेल्या आराखड्यानुसार, माहिती घेऊन इतर गावाचा, पाड्याचा त्यात समावेश करण्यात यावा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ न घेतलेल्यांना शौचालये देण्यात यावीत. शौचालय वापराबाबत ग्रामीण भागात जनजागृती करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विजेपासून वंचित राहिलेल्या गाव व पाड्यात वीज पुरवठा करावा. सौभाग्य योजनेची कामे पूर्ण झालेल्या कामाची आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. सौर दिव्याबाबत संबंधिताना प्रशिक्षण देण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री बिजली हरघर योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आरोग्य आदी विविध विभागांशी संबंधित केंद्रीय पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.