पावसाळा सुरू होताच शहरात मक्याच्या कणसांची आवक वाढते. हिरवट-पिवळी सालं असलेले मक्याचे कणीस अनेकांचे लक्ष वेधून घेते. धो-धो कोसळणाऱ्या पावसात पर्यटनस्थळांबरोबरच घरामध्ये लिंबू, मीठ, तिखट लावून भाजलेलं कणीस खाणं, हा अनेकांच्या आवडीचा कार्यक्रम असतो. नंदुरबार तालुक्यातही मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. बाजारपेठेसह, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरही त्यांची विक्री केली जात आहे.
पावसाळ्यात सातपुड्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी परजिल्ह्यातील असंख्य पर्यटक तालुक्यात येतात. तोरणमाळ येथील धबधबा स्थानिकांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दाट धुक्यामुळे सात पायरी घाटातील विलोभनीय दृश्य मन मोहून टाकते. याशिवाय अजूनही अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. या पर्यटकांसाठीही भाजलेले कणीस आकर्षण ठरते. स्थानिक छोटे व्यावसायिक या कणीस विक्रीतून आपला संसार चालवतात. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी जमणारे धबधबे व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्याचा फटका कणीस विक्रीलाही बसला आहे. काही तरुण तसेच छोटे व्यावसायिक नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठेसह विविध ठिकाणी मक्याच्या कणसांची विक्री करत आहेत. कच्ची कणसे ५० रुपयाला डझन, एक तर भाजलेले कणीस वीस रुपयांना एक असे विकले जात आहे.