लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने पूर्ण केले असून नागरिकांना मदत देण्यासाठी शासनाकडे १ कोटी ७१ लाखाची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.वादळामुळे जिल्ह्यात घरांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहादा आणि तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक नुकसान झाले. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी वादळग्रस्त भागांना भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विविध यंत्रणांना निर्देश दिले होते. कृषी आणि महूसल विभागातर्फे पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात ८७ तर तळोदा तालुक्यात ४ घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. दोन्ही तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या १,११० आहे. यात ४५९ शहादा तालुक्यातील तर ६४८ तळोदा तालुक्यातील आहेत. तर तळोदा तालुक्यात एक दुधाळ जनावर मृत्यूमुखी पडले आहे. झालेल्या नुकसानाबाबत नागरिकांना मदत करण्यासाठी निकषानुसार ८१ लाखाची मागणी करण्यात आली आहे.शहादा तालुक्यात ३१९ तर तळोदा तालुक्यात २८५ शेतकऱ्यांच्या ३६२ हेक्टरक्षेत्रावरील बागायत पिकांचे (फळपिके सोडून) ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यासाठी निकषानुसार ४९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील ३२३ शेतकऱ्यांचे फळपिकाखालील बाधित क्षेत्र २३१ हेक्टर आहे. त्यासाठी ४१ लाखांची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात वादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणीसाठी ८० लाख ७५ हजार आणि जनावर मृत झाल्याने पशुधन खरेदीसाठी २५ हजार रुपये प्रशासनास प्राप्त झाले आहे. या मदतीचे दोन दिवसात वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार नवापूरसाठी १८ हजार, शहादा ५३ लाख ९८ हजार ८९० आणि तळोदा तालुक्यासाठी २६ लाख ५८ हजार ६१० रुपये घरांच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणीसाठी वितरीत करण्यात आले आहेत.