असलोद गावात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यातून गावातील बसस्थानकापर्यंत गटार वाढवून मिळावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे ग्रामपंचायतीने केली होती. याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने शहादा बांधकाम विभागाला दिल्याची माहिती आहे. दरम्यान, या निवेदनाची बांधकाम विभागाने दखल घेतलेली नाही. यामुळे रस्त्याच्या बाजूस असलेली गटार ही वाढवून नवीन बसथांब्यापर्यंत व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने परिसरातील इतर गावात रस्त्याची सुरुवात होते तेथून गाव संपते तेथपर्यंत गटारींचे बांधकाम केले आहे. परंतु असलोद गावात मात्र गावाच्या सुरुवातीपासून गटारीचे बांधकाम केलेले नसल्याचे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आमदार राजेश पाडवी यांनाही याबाबत माहिती दिली. त्यांनी बांधकाम विभागाला सूचना करूनही कारवाई झालेली नसल्याची माहिती दिली जात आहे.
असलोद येथे गटारींचे वाढीव बांधकाम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST