तळोदा : तळोदा शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका संपला असला तरी पुढील प्रक्रिया पार पडेपर्यंत आहे त्या ठेकेदाराला मुदतवाढ द्यावी. कारण शहरात घाणीचे साम्राज्य वाढले असून, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दखल घ्यावी, अशी मागणी शहर शिवसेनाने केली आहे. याबाबत मुख्याशिकारी याना निवेदन दिले आहे.
या निवेदनात तळोदा शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराची एका वर्षाची मुदत संपलेली आहे. ही मुदत संपून दोन, तीन महिने झाले आहेत. परंतु पालिका प्रशासनाकडून नवीन ठेक्याची प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी या प्रक्रियेस दीड-दोन महिन्याचा अवधी लागतो. त्यामुळे साहजिकच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कचरा व्यवस्थापना अभावी शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्यादेखील दोन दिवसा आड येत नाही. त्यामुळे जिकडे-तिकडे घाण पसरली आहे. ठेक्याचा प्रलंबित असलेल्या प्रश्नामुळे यंदाचा पावसाळा जवळ येऊन ही अजून पावेतो नाले व मोठ-मोठ्या गटारींची सफाई सुरू करण्यात आलेली नाही. वास्तविक शहराला लागून असलेल्या खर्डी नदीचे पुराचे पाणी नेहमी काठावरच्या घरांमध्ये शिरत असते. साहजिकच त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. असे असताना पालिका हे काम पावसाळानंतर करणार आहे का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करून सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्याची पुढील प्रक्रिया पार पडेपर्यंत याच ठेकेदारास वाढीव मुदत द्यावी. पालिकेने यापूर्वी गेल्या वेळच्या निकृष्ट काम करणाऱ्या घनकचरा व रस्ता ठेकेदाराला मुदतवाढ आाणि काम देण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे या ठेकेदारासदेखील मुदतवाढ, द्यावी, अशी मागणी शहर शिवसेनेने पालिका मुख्याधिकारी यांचाकडे केली आहे. निवेदनावर शहर प्रमुख जितेंद्र दुबे, संघटक विनोद वंजारी, संजय पटेल, जगदीश चौधरी, श्रावण तिजबिज, विजय मराठे, नितीन ठाकरे, दीपक मोरे यांनी केली आहे.
सफाई कर्मचारी यांनी देखील पगारासाठी पोलिसांकडे केली होती तक्रार
शहरातील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या ठेकेदाराने सफाई कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन थकाविल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात थेट पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांची समजूत घालून परत पाठवले होते. त्यानंतर ठेकेदाराने त्यांचे थकीत वेतन अदा केल्याचे सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराचा ठेका संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे त्यानेही शहरातील स्वच्छतेकडे पाहिजे तसे लक्ष घातले नसल्याचे सांगितले जात आहे. निदान नगर पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी शहर वासियांच्या आरोग्याचा नाजूक प्रश्न लक्षात घेवून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी आहे.
शहरातील घन कचरा व्यवस्थापनासाठी १५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सफाईचे काम नियमित सुरू आहे. शिवाय निविन ठेक्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. - राजेंद्र माळी, कार्यालयीन अधिक्षक, नगर पालिका, तळोदा.