लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : आईने मटनाची भाजी बनवली नाही याचा राग आल्याने मुलगा व वडील यांच्यात झालेल्या झटापटीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वडाळी, ता.शहादा येथे 3 जून रोजी घडली होती. त्यानंतर वडिलांनी मुलाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी सोमवारी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी वडीलास अटक केली आहे.याबाबत वृत्त असे की, वडाळी, ता.शहादा येथे पंकज उर्फ समाधान प्रताप धनगर (28) हा कुटुंबासह राहत होता. 3 जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने आपल्या आईला मटनाची भाजी बनविण्यास सांगितले. मात्र आई आजारी होती व त्यादिवशी सोमवार असल्याने आई व वडिलांनी त्याला नकार दिला. याच कारणावरुन त्याचे वडील प्रताप बुधा धनगर हे समाधानची समजूत घालत असताना त्यांच्यात झटापट झाली. त्यात समाधानच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. समाधानचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत बैलगाडीत टाकून त्यांच्या शेताजवळील नाल्यात जाळण्यात आले. या घटनेची 4 जूनपासून वडाळी परिसरात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावरून वडाळीचे पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी यांनी प्रताप धनगर यांना बोलवून या घटनेबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता प्रताप धनगर यांनी घटनेची कबुली दिली. त्यावरून पोलीस पाटील गजेंद्रगीर अजरुनगीर बावा यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रताप बुधा धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे व हवालदार श्रावण बिरारे हे करीत आहेत. दरम्यान, मयत समाधान धनगर हा एका पायाने अपंग होता. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील राहायचा. एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, भावजयी असा परिवार आहे.
मटनाच्या भाजीच्या वादातून झटापटीत मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:56 IST