कोठार : अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर शहादाकडून बडोद्याकडे टरबूज घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघाताची घटना घडली. यावेळी चालकाला गतिरोधक लक्षात न आल्याने भरधाव ट्रक गतिरोधकावर आदळल्याने ट्रकच्या पाट्याची झोळी तुटून ट्रक उटल्याची घटना घडली.
तळोदा वळण रस्त्यावरील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ट्रकचे व टरबूज मालाचे नुकसान झाले. शहाद्याकडून बडोद्याकडे जाणारा ट्रक क्रमांक एमएच- १९ झेड- ५०९३ हा टरबूज घेऊन जात होता. बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळ असणाऱ्या गतिरोधकावर पांढऱ्या पट्ट्याचा अभाव आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाला गतिरोधक लक्षात आले नाही. ट्रक गतिरोधकावर चढताच ट्रकच्या पुढील दोन्ही पट्यांची झोळी तुटली व ट्रकचा तोल गेल्याने ट्रक उलटल्याची घटना घडली. यात ट्रकचे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकमध्ये भरलेल्या टरबूज पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी गितरोधक असल्याने या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने ते चालकांच्या लक्षात येत नसल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गतिरोधकावरील पांढऱ्या पट्ट्यांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच संबंधित विभागाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे व फलक लावून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.