लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयात दोन दिवसांपासून तोबा गर्दी उसळली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या गर्दीला आवर घालण्यासाठी गुरुवारी समितीला पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. शुक्रवारपासून तीन दिवस सुटी असल्याने बुधवार आणि गुरुवारी जात पडताळणी प्रस्तावांचा अक्षरश: पाऊस पडला असून ८०० जणांचे प्रस्ताव जमा करुन त्यांना निवडणूक लढवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यांतर्गत आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या विविध संवर्गातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रांसाठी त्या-त्या संवर्गातील व्यक्ती जात पडताळणी समित्यांच्या कार्यालयांमध्ये प्रस्ताव देत समितीचे टोकन घेत सज्ज होत आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील १ हजार ८८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर अनुसुिचत जमाती प्रमाणपत्र असलेले पुन्हा नंदुरबारच्या दिशेने निघाले होते. यातून बुधवारपासूनच येथे गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत येथे कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी सकाळपासून तिन्ही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने चारचाकी व दुचाकी वाहनांनी इच्छुक उमेदवार याठिकाणी दाखल झाले होते. मोठी गर्दी झाल्याने समितीकडून मुख्य प्रवेशद्वारे बंद करत केवळ एक खिडकी सुरू करण्यात आली. परंतू येथे गर्दी होत असल्याने दुपारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी ४५० प्रस्ताव बुधवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. यातून नंदुरबार जात पडताळणी समितीकडे दिवसभरात ४५० प्रस्ताव दाखल झाले. या सर्वांना टोकन देत निवडणूक लढवण्यास मुभा देण्यात आली. आलेल्या प्रस्तावांपैकी सर्वाधिक प्रस्ताव हे जळगाव जिल्ह्यातील होते.
गुरुवारीही ४०० च्या पुढे गुरुवारी दिवसभरात ४०० जणांना टोकन देत निवडणूक लढवण्याचा मार्ग माेकळा करण्यात आला. प्रमाणपत्र घेवून गेलेला उमेदवार निवडून आल्या वर्षभरात ऑनलाईन पद्धतीने वैधतेसाठी त्यांना अर्ज करावा लागेल. समितीकडे प्रस्ताव देण्यात महिलांचाही सहभाग होता.
निवडणूकांच्या टोकनमुळेही झाली वैधता दरम्यान एकीकडे ग्रामपंचायत निवडणूकांसाठी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव दिले जात असताना निवडणूकीत पराभव पत्करल्यानंतर काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातील अनेकांकडून पराभव झाल्यानंतरही समितीकडे पाठपुरावा सुरू केला होता. काहींकडून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनेक जण निवडणूकांच्या सोबतच जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करुन नंतर माघार घेत केवळ जात पडताळणी करुन घेण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे समोर आले आहे. २८ रोजी कामकाज सुरु झाल्यानंतर इच्छुकांकडे केवळ दोनच दिवस शिल्लक राहत असल्याने त्या दोन दिवसातही गर्दी वाढणार असल्याचे संकेत आहेत. यातून समितीकडून तयारी करण्यात आली आहे.