जिल्ह्यात २३ मार्च रोजी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये गारपीट झाली होती. या वादळात घरांचे, शेतीचे आणि वीज खांबांचे मोठे नुकसान झाले. भालेर परिसरात गारांमुळे शेतीपिकांची मोठी नासाडी झाली. शेतशिवारातील जीर्ण वीजतारा तुटणे, खांब वाकणे, खांब पडणे अशा अनेक घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, भालेर गावात तीन दिवसांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. त्यानंतर गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारातील वीजपुरवठा अद्याप सुरू न झाल्यामुळे वादळी पावसात वाचलेली पिके पाण्यावाचून जळत आहेत.
वीजपुरवठा खंडित होऊन आठवडा उलटला तरी भालेर परिसरात वीजखांब बदलवणे, दुरुस्ती करणे, वीजतारा नवीन टाकण्याचे काम संथ गतीने चालत असल्याने कृषी पंपांचा विद्युत पुरवठा अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके करपत असल्याने भालेर परिसरातील शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शेतपिकांतील ज्वारी, बाजरी, मका, मूग, भुईमूग व भाजीपाला पिके पाण्याअभावी करपत असून वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, संबंधित वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून वारंवार संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांकडून वीजतारा नवीन टाकणे, वीजखांब उभे करणे ही कामे संथ गतीने चालू असून होलिकोत्सव, संचारबंदी यासारख्या कारणांमुळे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. वीज पोल दुरस्ती करण्यासाठी ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून याबाबत वीज वितरण कंपनीने दखल घेऊन त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.